Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

Thursday 9 June 2022

Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

 

Question Bank B.A I

Marathi(Opt) DSC A -13

पाठ्यपुस्तक : बाकी सर्व ठीक आहे (निवडक कविता)

                                                                                                 -लोकनाथ यशवंत

Prof B.K.Patil

घटक : 

 

प्रश्न १ :जिवाचा आटापिटा या कवितेत कवीची जात कळावी म्हणून कोणते प्रश्न विचारले व कवीने कोणती उत्तरे दिली ?

उत्तर

            या कवितेत सर्व बाजुनी जातीचा शोध घेणार्‍या व जुनाट जातीभेद पाळणार्‍यांची जातियवादी प्रवृती उघडी पाडण्याचा प्रयत्न कवीने अत्यंत उपरोधिक पद्धतीने केला आहे. चातुवर्ण्य व्यवस्था, आरक्षण, धर्म, नातेवाईक, नोकरीचा कोटा इ. सगळ्या बाजुंनी जात शोधू पाहणार्‍या ह्या वर्णव्यवस्थेच्या पाहारेकर्‍याला कवीला कलावंताच्या कोट्यातुन नोकरी लागली आहे असे सांगावे लागते. म्हणून अशा जातीच्या हरळीला लगडून मनमानसिकता जातीशी घट्ट बांधून जगणार्‍याला कवी शेवटी म्हणतात "काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपटतात आणि तिथेच मरतात ? " आसा उपाहासत्मक टोला लगावला आहे.

 

प्रश्न २: शहरात राहूनही तुम्हाला काय काय समजत नाही असे कवी ' मुख्य प्रवाह ' या कवितेत म्हणतात.

उत्तर:

शहरी जीवन शैली ही ' ओठात एक पोटात एक' अशी मुखवटा धारन करणारी आहे. उलट सरळ साधेपणाने तोंडावर बेधडक बोलणे ही खेडेगावाची वैशिष्ट्ये इथे शहरात निरुपयोगी आहेत. इथे सगळेच अगदी दुटप्पी धोरणाने चालते. शहराचा मुख्य प्रवाह लबाड मुखवटाधारी वरवरच्या स्वार्थ्थी दुनियेचा आहे या प्रवाहात येणार्‍यानी त्यांच्यासारखं खोटखोटं वागावं म्हणजे सर्व कामे बिनबोभाट होतात.

      शेवटी कवी सांगतात शहरी वास्तव मन मारुन स्वीकारावे असे कवी उपरोधिक भाषेत सांगतात.

 

प्रश्न  ३ : 'एका वृक्षाची गोष्ट' कवितेत कवीने कोणता विचार मांडला आहे ?

उत्तर :

या कवितेत निसर्गालाच कुंडीत बंदिस्त करणार्‍या मानवाच्या बोन्साय प्रवृत्तीला कवीने अधोरेखीत केले आहे. पिंपळाच्या झाडाचे प्रतिक घेवून इथे माणूस व माणूसकीला बोन्साय, खुरटे करु पाहणार्‍या प्रवृत्तीला बाजूला सारुन माणूसकीचा पिंपळवृक्ष समतावादी पर्यावरणाच्या धारणेने खुल्या हवेत जमिनीत लावून त्याच्या मुक्त सळसळतेपणाचा स्वातंञ्यवादी अनुभव या कवितूत कृतकृत्य भावनेने व्यक्त केला आहे.

 

प्रश्न ४) ' राग ' या कवितेत कवी लोकनाथ यशवंत यांनी तकलादू समाजसेवा करणार्‍या समाजसेवकांचा बुरखा कसा फाडला आहे ? स्पष्ट करा.

     उत्तर: 

राग कवितेत कुपोषिक बालकांच्या बकाल जीवनाचे वास्तव  समोर आणून तकलादू समाजसेवा करणार्‍या बेगडी समाजसेवकांचा बुरखा फाडला आहे. कुपोषित सुंदर मूलं अकाली मरत आहेत, सरकारला असल्या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही एनजीओवाले आनंदात आहेत. हे वास्तव कवी डाॅक्टरांना सांगतात, डाॅक्टर म्हणतात, या कोपोषितांनी व वंचिताना शहराच्या मुख्य धारेत यावे, तेव्हा कवी म्हणतात, " तुमच्या वातानुकूलीत घरी आणून ठेवतो कुपोषित बालकांना "., तेव्हा आता डाॅक्टर समोरुन गेले तरी कवीकडे पहात नाहीत. हे वास्तव या कवितेत उपरोधिक  भाषेत मांडले आहे.

 

प्रश्न : ५ नवीन नाते निर्माण करताना जुने नाते अडगळीत टाकणार्‍या आजच्या समाजाची मानसिकता 'हे जीवन सुंदर आहे' या कवितेत कवी लोकनाथ यशवंत यांनी कशी व्यक्त केली आहे

    उत्तर :

 कवी समाजातल्या अमानवी व पाखंडी प्रवृत्तीवर निकराचा हल्ला करतात. जीवन सुंदर आहे , असं म्हणताना माया , ममता, कृतज्ञता यांचे पाश लांबवर पाहिले तरी दिसत नाहीत. मृत्यु अटळ आहे  हे नसर्गिक सत्य आहे पण त्याबद्दल दु:ख व्यक्त करायला आता वेळ नाही. दू:ख व कर्तव्य दडपून ठेवून नवीन नाती निर्माण करताना अपार प्रेम देणारं नातं अडगळीत ठेवण्याच्या कृतीलाच आज व्यवहार मानला जातोय. हे वास्तव अतिशय समर्पक शब्दात आजीच्या (वासंती आजीच्या) उदाहरणासहीत कवी लोकनाथ यशवंतानी चपखल शब्दात प्रकट केले आहे.

 

प्रश्न :   'भविष्य ' या कवितेत समाजातील कोणते वास्तव कवी लोकनाथ यशवंत यांनी मांडले आहे ?

    उत्तर : 

भविष्य सांगणारी व ते बघणारी वृत्ती समाजात आढळते. पैसा मिळविण्यासाठी लोकांच्या भावनाशी खेळणारा भविष्य सांगणारा भविष्य पाहणार्‍याच्या स्वभावावर हुकूम हुकूमत करुन पैसे काढतो. दैववादावर व चमत्कारावर पोसलेला समाज लाभ मिळविण्यासाठीचे भविष्य ऐकून स्वत: फसत असते. त्याबरोबरच भ्रष्टाचार व लोभीपणाने बरबटलेल्या मनानांच असे भविष्याचे उपचार लागतात. पण कवी म्हणतात, अशा माणसांच्या भावनांना हात घालून पैसे मिळवणारा कुठलाही विधीनिषेध पाळत नाही. उलट भविष्य पाहणार्‍याविषयी कवी किव व्यक्त करतात.

 

 प्रश्न ७ :खेड्यातून शहरात आलेल्या माणसाची कोणती मजबूरी कवीने ' तडजोड' या कवितूत शब्दबद्ध केली आहे ?

    उत्तर:

या कवितेत शहराच्या प्रवाहात राहत असतांना सतत तडजोड करावी लागते तडजोड केली की आपण बिनधास्त जगू शकतो.

 

हे कवी शहरी वास्तव सांगतात , हो ला हो म्हणून शक्तीशाली लोकांची तळी उचलून, कमजोरांचा विचार मनाला शिवूनही न घेता स्वार्थाचाच सतत विचार करायला लावणारे हे वास्तव ,खेड्यातला सरळ साधेपणा, दोस्ती, मैञी, यारी ,सदभावना इ. मानवतावादी भावनांना बासनात गुंडाळून ठेवते.

          शहरात गरजेतुन मैञी केली जाते ,काम होताच मोबाईलमधला नंबरही डिलीट होतो. इथे कुणाचाही कुणावर विश्वास नाही, अशा प्रदुषित वातावरणात तडजोड व मन मारुनच जगावे लागते, यालाच मुख्य धारेत असल्याचे मानणे, ही खेड्यातून शहरात आलेल्या माणसाची मजबूरी कवीला या कवितेत सांगायची आहे.

 

प्रश्न८ : 'पर्सनल मुलाखत' या कवितेत कवी लोकनाथ यशवंत यांनी कोणते वास्तव ठळकपणे सादर केले आहे ?

     उत्तर 

या कवितेत जातीची धारणा जोपासणार्‍या मानवी मनातील वास्तव सांगितले आहे. सगळे कॅलिबर पणाला लावून लेखी परीक्षा प्राविण्यात उत्तीर्ण झाल्यावर पर्सनल मुलाखतीच्या वेळी 'जातधर्म ' कळीचा मूद्दा ठरतो व  बौध्दिकता, हुषारी, व्यक्तिमत्व सगळं सगळं रसातळाला जातं आता वरती डोकं काढून महत्वाची ठरते ती ' जात '. हे सगळं वास्तव या पर्सनल मुलाखतीत आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Radhanagari College

Question Bank

B.A-l

Marathi(Opt)DSC A-13

पाठ्यपुस्तक : बाकी सर्व ठीक आहे

- लोकनाथ यशवंत

Prof-B.K.Patil

घटक: २

 

प्रश्न :१  'गौडबंगाल ' या कवितेत कवी लोकनाथ यशवंत यांनी शिकणार्‍या मुलांच्या मनातील खदखद कशी व्यक्त केली आहे ?

उत्तर :

स्वातंञ्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधन व परिवर्तननाचे पाईक असणारे कवी लोकनाथ यशवंत ' गौडबंगाल ' या कवितेतून वास्तवाची जाणीव करुन देतात. बुद्ध, डाॅ. आंबेडकर, मार्क्स, एंगल्स, माओ, प्लेटो इ. महापुरुषांची फक्त नावे घेवून त्यांच्या नावांचा उदो- उदो करुन सर्वसामान्य जनतेला आजच्या परिवर्तनशील युगात स्थितीशीलतेत अडकवून ठेवून पोकळ तत्वज्ञान सांगणारे तथाकथित मार्गदर्शक यांना थेट सवाल कवी करतात व म्हणतात, ' असे किती दिवस तेच तेच सांगणार सर .... ?' आजच्या निकडीच्या परिस्थितीत, काय करायचे ते सांगा ? कारण भांडवलशाहीने आपला अक्राळ- विक्राळ जबडा पुरता उघडला असून, धर्मांद प्रवृत्ती मेंदूत कथक (नाच) करीत आहे, अशा अवस्थेत स्वत:ला मार्गदर्शक, पालनकार ,बुद्ध ,आंबेडकर यांच्या विचारांचे तारणहार समजणारे तुम्ही आयुष्याच्या उतरणीवरही आपले स्वत:चे काहीच सांगत नसाल, नुसता भाषेचा फडशा व शब्दांना टोलविण्याचे काम करत असाल, तर अशाने तमात समाजाच्या प्रबोधन व परिवर्तनाचे कसं व्हायचं सर ..... ? हा गहिरा प्रश्न कवी उपस्थितीत करतात.

 

प्रश्न : २  'यारी शेवटचे आचके देते व्हेन्टिलेटरवर ' असे कवी 'पर्यावरण' या कवितेत का म्हणतात ? स्पष्ट करा.

उत्तर: 

पर्यावरण ' या कवितेत लोकनाथ यशवंत यांनी विषम सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक पर्यावरणाचे अविट वास्तव सांगितले आहे. या सार्‍याच पर्यावरणाचे प्रदुषण व्यक्त करताना कवी  जातीधर्म विरहीत होवू पाहतात. परंतू त्यास या प्रदुषणाने धर्माचे बाह्य अंग बनवून टाकले आहे. 'गट आणि दोस्ती ' परस्परांच्या समोर उभे राहते. तेंव्हा गट महत्वाचा ठरतो. दोस्ती कमकुवत ठरते, त्यामुळे या सर्व प्रकारच्या प्रदुषणाच्या लाटेमध्ये वाहणारी पिढी संभ्रमित होताना आढळते. विविध पातळ्यावर फोफावणारा हा तिथला संभ्रमितपणा कवीला बेचैन करतो, मग कवीच म्हणतो , 'करावं तर कसं करावं,.... ? ' हा प्रश्न अंत:करण पिळवटून विचार करायला लावतो.

 

प्रश्न : ३  'सोन्याचा दात ' या कवितेत कवीने उपरोधाची तीव्र जाणीव कशी व्यक्त केली आहे ?

उत्तर : 

भांडवलदार, नोकरदार मध्यम वर्ग व तिसरा सर्वसामान्य रखडत जीवन जगणारा श्रमिक वर्ग यामध्ये तिसर्‍या वर्गातील असंख्य कुपोषित बालके मरणाच्या दारात उभी, अनेक भगिनी वितभर पोटासाठी व कुटुंबाच्या असंख्य प्रश्नासाठी विवशेत वेश्या झालेल्या, वाढती बालमजुरांची संख्या, ही ग्लोबल बेकारी आणि हे उद्धवस्त असलेले तिसर्‍या जगाचे सगळे अस्तित्व महासत्तेच्या सोन्याने विकत घेतले आहे,  हे सांगताना होणारा संताप, महासंताप व लहानश्या कमकुवत मेंदूला होणारा ताप-महाताप हे कवी चिकित्सकपणे सांगतात

" तरीही दात तुमचा सोन्याचा,

हातात सोन्याच्या अंगठ्या

जोरदार...... "

     ही विषमतेची दरी खाऊजा नावाच्या राक्षसाने निर्माण केल्याचे व भांडवलदार व्यवस्था गरीब जगाला कशी लुबाडत आहे, याचे वास्तव या कवितेत मांडले आहे.

प्रश्न : ४  ' खाटीक सर खूपच दयाळू आहेत ' असे म्हणत कवी कोणते सत्य उपरोधिकपणे मांडतात ?

उत्तर : 

'मांजर ' या कवितेत ज्याची आवड व निवड बघून, ज्याचं अन्न त्याला  लिलया देवून स्वत: श्रेष्ठ ठरणारे कत्तलखोर समाजात असतात. असे समाजाच्या मजबूरीचा फायदा घेवून मोठेपणा मिरवणारे भोंदू कत्तलखोर असिम करुणा, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, प्राणीमाञावरील दया,याचा आव आणून एक दूसर्‍याला हसत हसत बळी देतायत. भुकेने व्याकुळ झालेल्या मांजरीसारखा खाली मान घालून, शेपूट घोळून सांगेल तसे ऐकणारा समाज  ते बोकडाच्या ताज्या मटणाचा तुकडा फेकून गप्प बसवून विकत घेतात, त्याला लाचार करतात व स्वत:ला असिम करुणेने, दु:ख जाणिवेने, प्राणीमाञावर दया करणारे दयावान समजून स्वत:च्या स्वार्थाची झोळी भरुन घेतात.

      या प्रकारचे वास्तव कवीने सांगितले आहे.

 

प्रश्न : ५  'स्पर्श ' या कवितेत अनाथ मुलांना भेटून कवीला झालेला आनंद आणि कुञ्याचे लाड करणार्‍या पण अनाथाकडे पाठ फिरवणार्‍या श्रीमंतांचे जीवन कवीने कसे व्यक्त केले आहे ?

उत्तर :

 या कवितेत कवी सांगतात,सगळेच धनवान, दाते व दयावान नसतात काही आपल्या सरंजामी दहशतीसाठी कुञ्यासारखे गुंड पोसून ठेवतात, तर काही कुञ्यासाठी चौकीदार ठेवतात. त्यांना रंगीबेरंगी कपडे घालतात, पण ज्यांना हा समाज पारदर्शी व समतेने पहायचा आहे ते धन्नाशेट अनाथालयातील मुलांच्या डोळ्यातील आनंद पाहतात.त्यांना प्रेम , दया , माया, खाउ व वस्ञे देतात. त्यांच्या स्पर्शाने पुलकित होतात. अनाथ मुलांच्या बकाल जीवनात गुलाब डोलवतात, मानवतेच्या सुखाचा सुगंध पसरवतात ते या करुणाकार स्पर्शाने मानवजातीचे सोने करतात.

असे कवीला स्पर्श या कवितेत सांगायचे आहे.

 

 

प्रश्न :६ सैनिकाचे देशप्रेम आणि सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार यांचे चिञण कवी लोकनाथ यशवंत यांनी कसे केले आहे? ' युद्ध असे सुरु होते ' या कवितेच्या आधारे स्पष्ट करा .

उत्तर : 

युद्ध कुणाला हवे असते ? तरीही युद्ध सुरु होते या ओळीने कवितेला सुरुवात होते.युध्दात पगारी सैन्य मारले जातात, स्ञिया विधवा, मुलं अनाथ,गरिबी ,दारिद्य्र वाढत जाते हे कसे होते कळत नाही, पण युध्द केले जाते. .सत्ता, साम्राज्य वाढीसाठी वित्तिय व बेकारीच्या समस्य, आर्थिक तूट, महामंदी, निर्याद बंदी अशा अवस्थेत सत्ताधार्‍यांची बुध्दी बंद होते.मग युध्द हा पर्याय नसून सुध्दा तो केला जातो,निर्रथक युद्धाला अर्थ लाभतो. युध्द या घृणास्पद शब्दात आस्था भरली जाते आणि भ्रष्टाचाराचे भलेमोठे अगर असलेले युध्द लादले जाते त्यामूळे सीमारेषा विराण होवून जमीन जखमी होते व हकनाक सगळे होते. गरीबी वाढते, असे सांगुन 'युद्ध असे सुरु होते हे वास्तव कवी सांगतात.

 

प्रश्न : ७ कोणाकोणाच्या माता आपल्या मुलांना जन्म देवून धन्य झाल्या आहेत असे कवी लोकनाथ यशवंत म्हणतात ?

उत्तर :

सुंदर जन्माचा मजबूत पाया म्हणून आईचा जन्म ! ही निरालस व अत्यंत प्रामाणिक भावना कवीने या कवितेत मांडली आहे. खुलेआम नरसंहार करणारा, बंदुकीचा शोध लावणारा,अणुबाॅंब बनविणारा, माणसा - माणसात भेद करुन द्वेष पसरविणारा जिचा मूलगा असेल तर अशा आईने जन्मच घेऊ नये, असे कवी म्हणतात.त्याच्या तुलनेने विमानाचा शोध लावणार्‍या  राईट बंधूच्या आईने, मायकल फॅरेडच्या आईने,एडिसनच्या आईने अनेकवेळा जन्म घ्यावा कारण अशा आईने हे सुंदर जग आणखी सुंदर करावे, व येणार्‍या अर्भकासाठी अशी सूंदर आई पुन:पुन्हा जन्माला आली पाहिजे.असे कविला मनापासून वाटते.

 

 

 

 

प्रश्न : ८ ' शेतमजूर 'या कवितेत मजुराचे जीवन कवीने कसे व्यक्त केले आहे ?

उत्तर : 

शेतमजूर या कवितेत सरळमार्गी, कष्टाळू जीवन जगणार्‍या कलंदर शेतमजूराच्या जीवन शैलीचे व मनोवृत्तीचे चिञण आलेले आहे. अन्न, वस्ञ आणि निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी माफक अपेक्षा ठेवून जगणारा शेतमजूर,शेतमजूरी करतो, कष्ट उपसतो, चुलीवरची गरम भाकरी खाऊन संध्याकाळी घरी आल्यावर गोधडीवर बिनधास्त सुखाची झोप घेतो व जगाची सुंदर स्वप्ने बघतो. ज्याची मुले शिक्षणात तरबेज आहेत, बायको कष्ठाळू आहे. मनूष्य म्हणून एकदाच मिळणार्‍या जीवनावर तो खूप प्रेम करतो. जणू जगण्यातून श्रमातून, घामातून कलंदराची व्याख्याच अमलात तो आणतो. परंतू तो कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यासारखी आत्महत्या करत नाही तर असेल त्या परिस्थितीत दोन हात करुन जगतो, संघर्ष करतो, लढत राहतो.हे शेतमजूराचे सामर्थ्थ या कवितेत व्यक्त केले आहे.

     अशा प्रकारे लोकनाथ यशवंत यांची कविता मानवी शोषणाचा इतिहास, वर्णव्यवस्थेचे भीषण स्वरुप, माणसाला हिन पातळीवर जगायला लावणारी धर्मसूञे या सार्‍याना स्पष्ट नकार देऊन प्रसंगी त्याविरुद्ध विद्रोह पुकारुन समतेचे पर्यावरण आणू पहाणारा कवी खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या भीषण दरीला अधोरेखित करताना कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही, त्यामुळेच लोकनाथ यशवंत यांची कविता दोन भिन्न सांस्कृतिक जगातील द्बंद शब्दबद्ध करताना दिसते.

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Group Discussion

 (e-content developed by Dr N A Jarandikar) GROUP DISCUSSION ·          Group Discussion: Q. 3 (A) – Marks: 08 ·          Group Discussi...